Siddhi News पुणे — मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणमुळे सगळीकडे खळबळ माजली आहे. हुंड्याच्या अमानवी छळामुळे तिने आपलं आयुष्य संपवलं, असा आरोप तिच्या सासरच्या मंडळींवर केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर हगवणे घराण्याची थोरली सून मयूरी जगताप हिने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे — तिनं थेट महिला आयोगालाच जबाबदार धरलं आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मयूरीचं स्पष्ट म्हणणं — “महिला आयोग फक्त नावापुरता”
मयूरी म्हणते, “माझ्याही बाबतीत महिला आयोगाने काहीच केलं नाही. पोलिसांवर आणि आयोगावर राजकीय दबाव होता असं वाटतं.” ती पुढं म्हणाली, “जे पोलीस आधी माझ्याशी चांगलं बोलत होते, ते दुसऱ्याच दिवशी उर्मटपणे वागायला लागले.” तिचा रोष स्पष्ट जाणवत होता.
वैष्णवीला बाहेर पडता आलं नाही
वैष्णवीच्या मृत्यूवर ती भावनिक होऊन म्हणाली, “मी सुद्धा छळ सहन केला, पण मी बाहेर पडू शकले. वैष्णवीला तसं जमलं नाही… तिचा नवरा हे एक मोठं कारण होतं.” तिनं अधिकच ठामपणे सांगितलं की, “या प्रकरणात जे जबाबदार आहेत, त्यांना जन्मठेपच झाली पाहिजे.”
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण वर महिला आयोगाला उशिराची जाग
दुसरीकडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं की, “या दुर्दैवी घटनेची आम्ही १९ मे रोजी स्वतःहून दखल घेतली आहे. पुणे पोलिसांना योग्य ती चौकशी आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.”
पण मयूरीचा आक्षेप आहे की, “ही भूमिका खूप उशिराने घेतली गेली, जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली होती.”
वैष्णवीच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उभे केले आहेत — सासरच्यांचा छळ, पोलिसांचा उशिरा प्रतिसाद, आणि महिला आयोगाच्या कामगिरीवर उठणारे बोट. आता पाहावं लागेल की या प्रकरणात खरंच न्याय मिळतो का, की नेहमीसारखं हे प्रकरणसुद्धा विस्मरणात जातं…