Siddhi News पुणे – विज्ञानविश्वातील अत्यंत आदरणीय नाव, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत नारळीकर यांचं निधन झालं आहे. पुण्यातील त्यांच्या राहत्या निवासस्थानी मंगळवारी पहाटे झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं देशातील वैज्ञानिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
डॉ. जयंत नारळीकर यांचं शून्य आजारपण, शांततेत निरोप
डॉ. नारळीकर यांना कोणताही दीर्घ आजार नव्हता. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी, गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन झालं होतं. त्या काळातही त्यांनी संयम ठेवत आपलं संशोधन व विज्ञानप्रसाराचं कार्य सुरू ठेवलं होतं.
डॉ. जयंत नारळीकर यांचं खगोलशास्त्रातील अमूल्य योगदान
१९३८ साली कोल्हापुरात जन्मलेले जयंत नारळीकर यांचं बालपण वाराणसीत गेलं. त्यांचे वडील रॅंग्लर विष्णू नारळीकर हे एक ख्यातनाम गणितज्ज्ञ होते, तर मातोश्री सुमती नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. शालेय शिक्षण वाराणसीत पूर्ण केल्यानंतर जयंत नारळीकर यांनी केंब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेतलं.
त्यांनी प्रसिद्ध ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत काम करत ‘Steady State Theory’ सारख्या महत्त्वाच्या संकल्पनांवर संशोधन केलं. त्यांच्या या कामामुळे जागतिक खगोलशास्त्रात त्यांना विशेष स्थान मिळालं.
आयुका संस्थेच्या स्थापनेत डॉ. जयंत नारळीकर यांचं मोलाचा वाटा
डॉ. नारळीकर यांनी १९८८ मध्ये पुण्यात ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स’ (IUCAA) या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे पहिले संचालक म्हणून त्यांनी भारतात खगोलशास्त्राच्या संशोधनाला नवी दिशा दिली. अनेक तरुण संशोधकांना त्यांनी दिशा आणि प्रेरणा दिली.
विज्ञानप्रसार आणि साहित्य क्षेत्रातही भरीव कामगिरी
केवळ संशोधनापुरतं मर्यादित न राहता, डॉ. नारळीकर यांनी विज्ञान सामान्य माणसांपर्यंत पोहोचावं यासाठी लेखन आणि व्याख्यानांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान दिलं. त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये विज्ञानकथा, लघुनिबंध, अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली आहेत.
नाशिकमध्ये पार पडलेल्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते. हा सन्मान त्यांच्या विज्ञान आणि साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दलचं मोठं प्रमाणपत्रच होतं.
सन्मान आणि गौरव
डॉ. नारळीकर यांना त्यांच्या कार्यासाठी भारत सरकारने ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ या राष्ट्रीय सन्मानांनी गौरवलं. याशिवाय त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. ते भारतीय विज्ञानविश्वातील आदर्श आणि प्रेरणास्थान होते.